मुंबई : राज्यावरील वीज टंचाईचे संकट हळूहळू कमी होईल अशी अपेक्षा असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसहीत उपनगरांमध्ये आज सकाळी बत्ती गुल झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईसह उपनगरातील वीजपुरवठा करणाऱ्या ४०० केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा बिघाड झाल्याने आज ( सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई व ठाणे डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, याचा फटका राज्यपालांना देखील बसल्याची माहिती समोर आली आहे. कारण आज मुंबईत शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा पार पडत आहे. त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कळवा पडघा येथील वीजपुरवठा केंद्रामध्ये हा बिघाड झाला आहे. त्यामुळे दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर भागांमधील वीजपुरवठा खंडित झालाय. ठाणे आणि कळव्यामध्येही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आलं असून वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांमध्ये टप्प्याटप्प्यांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
महापारेषणच्या पडघा येथील उच्च दाब वीजवाहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवली, कल्याण. बदलापूर, अंबरनाथ शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कुर्ला, चेंबूर, वाशीसहीत पालघरमधील संपूर्ण विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.