प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबत सक्ती
जिल्हाधिकारी, कुलगुरुंकडे दाद
– डॉ. राजू गुरव
पुणे – करोना प्रादुर्भाव वाढत असतानाही वरिष्ठ महाविद्यालयांकडून केंद्र व राज्य शासनाचे आदेश धुडकावत प्राध्यापकांना “वर्क फ्रॉम कॉलेज’ची सक्ती करण्यात येत आहे. गैरहजर राहिल्यास वेतन कपातीचा इशारा दिला आहे. यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबतचा फतवा व्हॉट्स ऍप, ई-मेलद्वारे बजाविण्यात येत आहे. महाविद्यालयात अद्याप अध्यापनाचे काम सुरू झालेले नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतही संभ्रम कायम आहे. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयानेही “वर्क फ्रॉम होम’ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांकडून होताना दिसून येत नाही. दररोज या, असेल ते काम करा, काम नसेल तर बसून रहा अशा सूचना प्राचार्यांकडून प्राध्यापकांना देण्यात येत आहेत. काही महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दररोज येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना वेतन थांबिण्यात येईल, कपात करण्यात येईल असे म्हणत दम भरला आहे.
काही प्राध्यापक नियत वयोमानानुसार सेवा निवृत्तीच्या जवळ आले आहेत. जे शुगर, रक्तदाब, दमा या सारख्या आजारांमुळेआधीच त्रस्त आहेत. त्यांनाही कोणतीही सवलत दिली जात नाही. काही प्राध्यापकांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही उघड होऊ लागल्या आहेत.
प्राध्यापकांना सक्तीने महाविद्यालयात बोलावण्याच्या प्रकारांना आळा घालावा व “वर्क फ्रॉम होम’ची मुभा कायम ठेवावी, अशी मागणी काही संघटनांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे. एका नामांकीत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडेच दाद मागितली आहे.
काटेकोर पालन व्हावे…
शासनाने महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या सर्व निर्देशांचे महाविद्यालयांनी काटेकोर पालन केले पाहिजे. जी महाविद्यालये प्रतिबंधित क्षेत्रात आहेत किंवा प्रतिबंधित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून योग्य तो अर्ज स्वीकारून त्यांना “वर्क फ्रॉम होम’ची सोय उपलब्ध करून द्यावी, असे आदेश विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या सहायक कुलसचिवांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नुकतेच बजाविले आहेत.
वरिष्ठ महाविद्यालयांनी राज्य शासन, विद्यापीठ यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. सरसकट सर्वांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करणे योग्य नाही. सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. आवश्यक ती कामेही सुरू राहतील अन् कोणाला फार त्रासही होणार नाही असा पवित्रा महाविद्यालयांनी घेतला पाहिजे.
– डॉ. मोहन खताळ, उच्च शिक्षण सहसंचालक, पुणे विभाग