मुंबई – भारतीय संघाकडून खेळणारा कृणाल पंड्या याला त्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले गैरवर्तन भोवले आहे. बडोदा क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या कृणालने या पदाचा राजीनामा दिला आहे.
कृणालने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बडोदा संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशजनक झाली होती. बडोदा संघाने ब गटात पाच पैकी केवळ एका सामन्यात विजय नोंदवला होता. या स्पर्धेत पंड्याची कामगिरीही सुमार झाली होती. त्याला या स्पर्धेत केवळ 83 धावाच करता आल्या. तर गोलंदाजीत त्याने 6 बळी घेतले होते. आगामी काळात देशांतर्गत स्पर्धेत निवडीसाठी उपलब्ध असेन, असेही त्याने राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.
कृणालच्या जागी केदार देवधरकडे बडोदा संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. आगामी विजय हजारे स्पर्धेत केदारकडे ही नवी जबाबदारी दिली जाणार आहे. पंड्याला दोन मोसमांपूर्वी कर्णधापद देण्यात आले होते. संघाच्या कामगिरीशिवाय तो वादामुळे अधिक चर्चेत राहिला. दीपक हुडाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.
पंड्याने शिवीगाळ केल्याची आणि कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार दिपक हुडाने केली होती. या तक्रारीनंतर बडोदाचा संघ सोडून दीपक राजस्थानच्या संघात दाखल झाला होता. याप्रकरणात बडोदा क्रिकेट संघटनेने दीपकवरच संताप वयक्त केला होता. त्यानंतर दीपकने राजस्थानकडून खेळण्याचा करार केला होता. मात्र, आता कृणालचे वर्तनच या सगळ्याला कारणीभूत ठरल्याचे संघटनेने म्हटले आहे.