सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस : अद्यापही कोसळधारा सुरूच
बारामती- बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा दुपटीहून जास्त पाऊस पडला आहे. बारामती तालुक्यात सरासरी 383 मिमी पावसाची नोंद होते मात्र यंदा 632 मिलिमीटर पावसाची नोंद झाले आहे. वडगाव निंबाळकर महसूल मंडळात सर्वाधिक 951 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे मालेगाव 860 बारामती ते 774 लोणी भापकर 596 मोरगाव 543 सुपे परिसर 400 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे जिरायती भागातील चांदवड येथे मात्र 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाले आहे. परतीच्या अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्यातील भूजल पातळी वाढली आहे विहिरी तसेच विंधन विहिरींची हीप पाण्याची पातळी वाढली आहे.
गेले अनेक वर्ष बारामती तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. परतीच्या अवकाळी पावसामुळे सध्या ओला दुष्काळ पडला आहे त्यामुळे दुष्काळ व ओला दुष्काळ या दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला आहे. शासनाकडून वेळेत आर्थिक मदत मिळावी ही माफक अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बारामती तालुक्यात तब्बल आठ वर्षानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. असे असले तरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने ओला दुष्काळ निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात लोटला गेला. अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्याचे चित्र पलटले आहे सुरुवातीला पाणीटंचाईने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे.
- साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्यातील साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा ,बाजरी, सोयाबीन तसेच उसाच्या लागणीचा समावेश आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मंगळवार (दि. 5) पर्यंत 70 टक्क्यांपेक्षा अधिक पंचनामे झाले असले तरी पंचनामे झाल्याने यातील पिकांची वर्गवारी व इतर बाबीपूर्ण करण्यास थोडा अवधी जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. - शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीने फेरले पाणी
अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यात आल्याच्या पिकाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे बारामतीतील शेतकरी पाहत आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. तालुक्यातील माळेगाव, पणदरे सांगवी गावातील य आल्याच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आल्याचे पीक सडले आहे. त्यामुळे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. - बारामती तालुक्यात सखल भागातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. असे असले तरी पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू आहे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक पंचनामे झाले आहेत. सहा तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योग्य तपशीलद्वारे खातेनिहाय मदत दिली जाणार आहे.
– विजय पाटील, तहसीलदार, बारामती - बारामती उपविभागात जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बारामती तालुक्यात जवळपास साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, सोयाबीन, बाजरी, कांदा तसेच उसाच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. बुधवार (दि. 6)पर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पंचनामा करत असताना शेतकऱ्यांकडून एका फॉर्ममध्ये पिके, क्षेत्र याची माहिती त्यासोबत सातबारा, आठ “अ’, आधार कार्ड, फोटो व बॅंकेच्या खात्याचा तपशील तसेच सोबत तीन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जात आहेत. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– बालाजी ताटे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती