बारामती (प्रतिनिधी)- पुणे मुंबई येथून छुप्या मार्गाने शेकडोंच्या पटीत स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांचा बारामतीला धोका असून प्रशासनाने याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांनी व्यक्त केले आहे.
बारामती शहर कोरोना मुक्त असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा धोका वाढत आहे. माळेगाव येथे कोरोना संक्रमित दुसरा रुग्ण सापडला ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच छुप्या मार्गाने येणारे पुण्या-मुंबईचे लोंढे थांबविणे गरजेचे आहे.
बारामती शहर व तालुक्यातील लॉक डाऊन शितल करण्यात आले आहे. नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे मात्र शहरातील रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत .
योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. लॉक डाऊन शितल करून जिल्ह्यातील सीमा बंदी देखील शितील करण्यात आली आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. पुणे मुंबई तसेच इतर जिल्ह्यातून छुप्या मार्गाने बारामतीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे .
त्यामुळे कोरोनाचा धोका देखील वाढला आहे. छुप्या मार्गाने प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी किशोर मासाळ यांनी केली आहे. पुणे मुंबई तसेच इतर जिल्ह्यातून गावात प्रवेश केलेल्या व्यक्तीची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनास कळवावी असे आवाहन मासाळ यांनी केली आहे.