शेतकऱ्यांना अत्याधुनिक सुविधा; उलाढाल 200 कोटींवर
– दीपक पडकर
जळोची – पुणे जिल्ह्यातील मोठी भुसार बाजारपेठ म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजारपेठ प्रसिध्द असल्याचे उलाढालीवरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. याच कारणातून आता येथील बाजारभाव आता पणन मुंबई आकाशवाणीवरील केंद्राद्वारे प्रसारित केले जात आहेत. तसेच बाजार समितीच्या प्रसिद्धी फलकांबरोबरच येथील विद्याप्रतिष्ठानच्या कृषी वाहिनीवरुनही याबाबतची माहिती दिली जात असल्याने बारामती बाजार समितीतील बाजारभावांची दखल आता जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील कृषी उत्पन्न समितींकडूनही घेतली जात आहे.
बारामती बाजार समितीची वार्षिक उलाढाल जवळपास 180 ते 200 कोटी रुपयांवर पोहचली आहे. गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने बाजार समितीत ज्वारी, बाजरी, गहू, सोयबीन, सूर्यफुल, करडई आदी विविध प्रकारच्या शेतमालाच्या आवक घटली होती. मात्र, त्या तुलनेत गुळ, भाजीपाल्याची आवक वाढली होती. यातून चालू वर्षी बाजार समितीची 200 कोटी उलाढाल झाली असल्याचे सांगण्यात आले.
बारामती तालुक्यातील 108 गावांपैकी 68 गावे बारामती मार्केट क्षेत्रात येतात. विविध प्रकारच्या शेतमालाची व जनावरांची खरेदी-विक्रीही येथे होते. सुमारे 31 एकर जागेत बाजार समितीचे प्रमुख आवार आहे. शिवाय बाजार समिती अंतर्गत सुपे येथे तीन तर जळोची येथे 42 एकरात दुय्यम बाजार भरतो. जळोची येथे भाजीपाला व फळांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांना 84 गाळे दिलेले आहेत. याठिकाणी लिलाव दररोज सकाळी सात वाजता सुरू होऊन 11 वाजेपर्यंत सुरू असतो.
शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा, या हेतूने बाजार समितीत दोन यांत्रिकी चाळणी बसवण्यात आल्या आहेत. दोन यांत्रिकी चाळणी आणि दोन डिस्टोनर यंत्रे, यात शेतकऱ्याने आपला माल स्वच्छ करून विकावा हा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता व ग्रेडिंग केल्याने जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यांस मिळून, ग्राहकांनाही स्वच्छ माल मिळतो. निर्यातीसाठीही याचा वापर केला जातो. तर एक क्विंटल स्वच्छतेसाठी हमाली, इलेक्ट्रॉंनिक चार्जेस, दोरा आदी खर्च प्रतिक्विटंल 60 रुपयांप्रमाणे शुल्क, पॅकिंग आकारानुसार आकारणी करण्यात येते. दरवर्षी शेतकरी सुमारे 20 हजार क्विटंल तर व्यापारी 15 हजार क्विटंल भुसार मालाची चाळणी करतात. याच कामासाठी बाहेर जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र, बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या यांत्रिकी चाळणीमुळे प्रति क्विटंल 50 ते 150 रुपयांचा जादा दर शेतकऱ्यांना मिळतो.
बाजारातील उपलब्ध सुविधा…
1) बाजार आवारात, शेतकऱ्यांचे मेळावे, धान्य महोत्सव ग्राहक ते थेट विक्री, कृषी प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी सहलींच्या अनुषंगाने निवास. लग्न समारंभ, आदी कामासाठी रयत भवनची उभारणी
2) भूईमूग शेग, तेलबिया, गुळ, आदींच्या विक्रीसाठी भव्य सेल हॉल.
3) देशभरातील प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव, पीक लागवड, ड्रिप इरिगेशन, पॉलीहाऊस, आदींच्या माहितीसाठी मुख्यालयातील माहिती केंद्रात 60 इंची प्रोजेक्शन टी.व्ही.
4) संगणकीय लिलावाचे एल.ई.डी. टी.व्ही बसवल्याने शेतकऱ्यांना मुख्यालयातच दर मिळण्यास मदत.
5) गुळ व तेल बियांसाठी प्रायोगिक तत्त्वावर जागतिक बॅंक प्रकल्पांर्गत लिलाव पध्दत.
बाजाराची वैशिष्ट्ये….
1) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जनावरे, शेळीमेंडी व वरणीचे उघड पद्धतीने लिलाव.
2) वजन मापावर देखरेख व नियंत्रण असल्याने आवक होताच शेतकऱ्यांच्या मालाचे त्वरित वजन केले जाते.
3) याच दिवशी शेतकऱ्याला हिशोब पट्टी आणि माल विक्रीची रक्कम दिली जाते.
4) अन्य बाजारातील माल ही मोठ्या प्रमाणात विक्रीस येतो.
5) मार्केट शुल्क, इमारत भाडे, वजन काटा, परवाना, यांत्रिकी चाळण, रयत भवन, पेट्रोल पंप, गांडूळखत अशा विविध मार्गांनी उत्पन्नाचे स्त्रोत.
6) 60 टन इलेक्ट्रॉनिक भुईकाटा.
7) बाजार समितीच्या टाकाऊ कचऱ्यापासून गांडुळखत निर्मिती.
शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्यावर समितीने सुरवातीपासूनच भर दिला आहे. याच कारणातून येथील उलाढाल वाढली आहे. या पुढेही शेतकऱ्यांचेच हित जपण्यावरा समितीचा भर असेल.
– अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती