बॅंकांनी मुख्य कामाबरोबरच सामाजिक भान ठेवण्याची गरज
मुंबई – सध्या जागतिक आणि देशांतर्गत कारणामुळे मंदी निर्माण झाली आहे. आर्थिक पुनरूज्जीवनात आता बॅंका महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून डोअर स्टेप बॅंकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, देशातील बॅंकांनी आतापर्यंतच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. भारतीय नागरिकांच्या आर्थिक गरजा बॅंकांना माहीत आहेत. आगामी काळामध्ये या गरजा पूर्ण करण्यासाठी बॅंका उत्प्रेरक म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
सीतारामन म्हणाल्या की, प्रत्यक्ष बॅंकिंग व्यवहार करण्याबरोबर बॅंकर्सना सामाजिक भान ठेवून काम करण्याची गरज आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांवर समाजहिताचे काम करण्याचे उत्तरदायित्व आहे. याचा कधीही विसर पडू देऊ नका. मंदी कमी झाल्यानंतर देशातील बॅंकाचे व्यवहार आणि उलाढाल वाढण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनांची माहिती ठेवावी
सरकारने जनसामान्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या असतात. या योजनांचा बॅंकांशी संबंध असतो. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांनी सरकारच्या योजनांची माहिती ठेवण्याची गरज असते. त्यामुळे या योजनांचा फायदा जनसामान्यांना होण्यास मदत होते, असे सीतारामन यांनी सांगितले. सरकार आणि बॅंकांनी संयुक्तपणे काम करून सध्याच्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.