मुंबई –भारताची वित्तीय स्थिती इतर देशांपेक्षा मजबूत आहे. मात्र तरीही बॅंकांनी गरजेपेक्षा जास्त जोखीम घेऊ नये, असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
स्थिरता अहवालात दास यांनी म्हटले आहे की, बॅंकांनी करोना व्हायरसच्या काळात उत्तम कामगिरी केली. यातून पद्धतशीरपणे बाहेर पडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. बॅंका मजबूत राहिल्या तरच उद्योगक्षेत्राला ताकदीने वाटचाल करता येणार आहे. बहुतांश पतमानांकन संस्थांनी या वर्षी भारताचा विकासदर शून्य टक्क्यापेक्षा कमी राहणार असल्याचे म्हटले असले तरी शेअरबाजाराचा निर्देशांक वाढत आहेत याबद्दल त्यानी चिंता सूचित केली.