हैदराबाद,दि.18- करोना व्हायरसच्या संसर्गामुळे ग्राहक नोटा हाताळण्यात संकोच करीत आहेत. त्यासाठी आगामी काळात डिजिटल व्यवहार वाढतील. यासाठी भारतातील बॅंकांनी डिजिटल व्यवहार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक विकसित करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एच आर खान खान यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना खान म्हणाले की, सध्या लॉक लॉकाऊनमुळे बहुतांश लोक घरी आहेत. त्यामुळे लोकांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. नोटा घेतल्यानंतर किंवा दिल्यानंतर हात सॅनेटाईज करण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत लोक जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहाराला पसंती दर्शविण्याची शक्यता आहे.
या पेचप्रसंगामुळे बॅंकांनी हतबल न होता त्याला संधी समजावे आणि आपल्या उत्पादनांचा पुरवठा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी नजीकच्या काळात बॅंकांना या क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागणार आहे. भारतातील साक्षरतेचे प्रमाण आणि दर्जा पाहता ही उत्पादने जास्तीत जास्त साधी, सोपी आणि सुटसुटीत असण्याची गरज आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना या माध्यमातून व्यवहार करता येऊ शकतील असे खान यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत परंपरागत पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवे तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा वापर करण्यासाठी बॅंकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. या काळात देशातील बॅंकांनी उत्तम कामगिरी केली आहे. आगामी काळातही आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बॅंकांचा वापर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.