– एन. आर. जगताप
एटीएमचा मुख्य उद्देश आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी बॅंकेच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागू नये व बॅंकेच्या कामकाजाच्या वेळेच्या व्यतिरिक्तही 24 तासांत कधीही गरजेनुसार आपल्या खात्यातील पैसे सहजरीत्या काढता यावेत हा आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील बहुतांश एटीएममध्ये रोख रकमेचा नेहमीच खणखणाट असतो.
काही ठराविक बॅंकांचे एटीएम मशीन कायमच नादुरुस्त दिसून येतात, तर काही एटीएममध्ये पैसेच नसतात. ज्या बॅंकांचे एटीएम हे त्यांच्या कार्यालयाच्या लगतच आहेत त्या एटीएम मशीनमध्ये काही प्रमाणात का होईना पैसे उपलब्ध असतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची या एटीएममुळे सोय कमी आणि गैरसोयच अधिक होताना दिसत आहे. बहुतांश एटीएममध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक नाही. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या भरवशावरच हे एटीएम आहेत. एटीएममध्ये बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेच चालू आहेत का, हे पाहणेही गरजेचे आहे. रात्री-अपरात्री गरज लागल्यास एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अनेक वेळा एटीएममधील विद्युत प्रवाह खंडित झालेला असतो. एटीएमच्या आत व बाहेर विद्युत दिवे नसतात किंवा ते बंद असतात. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन रात्री एटीएममधून पैसे काढल्यानंतर चोरीच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. खासगी व सहकारी बॅंकांच्या एटीएमबाहेर तरी सुरक्षारक्षक असतात. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएमचा प्रश्न गंभीर बनला आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील गर्दीला कंटाळूनच ज्येष्ठ नागरिक, महिला या एटीएमचा वापर करण्यावर भर देतात. मात्र, एटीएममध्ये असणाऱ्या रोख रकमेच्या खणखणाटामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी वैद्यकीय कारणांसाठी जर रोख रकमेची गरज पडली तर जर एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसेल तर या एटीएम मशीनचा उपयोग तरी काय?