मुंबई -मोदी सरकारने देशातील 10 सरकारी बॅंकांचे चार बॅंकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे सलग 4 दिवस बॅंक बंद राहणार आहेत.
बॅंक कर्मचाऱ्यांनी 26 आणि 27 सप्टेंबर असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे. त्यानंतर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बॅंकांना सुट्टी असल्याने 28 सप्टेंबर रोजी बॅंकेचे काम बंद राहणार आहे. तर 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बॅंकांना सुट्टी असते. त्यामुळे सलग 4 दिवस बॅंका बंद राहणार असल्याने नागरिकांना बॅंकाचे व्यवहार आताच उरकावे लागणार आहे.
केंद्र सरकारने 30 ऑगस्ट रोजी देशातील 10 सरकारी बॅंकांचे चार बॅंकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कंफेडरेशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स कॉंग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक ऑफिस या चार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
एआयबीओसीचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी सांगितले की, देशभरातील राष्ट्रीयीकृत बॅंक 25 सप्टेंबर रोजी मध्यरात्री संपावर जाणार आहे. तर 27 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत हा संप सुरु राहणार आहे. बॅंकांच्या विलिनिकरणाला विरोध आणि अन्य मागण्यांसाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.