मुंबई, – बॅंकांमध्ये गुंतवणूक करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. तसेच बॅंक खासगीकरणाच्या अंमजबजावणीसाठी सरकार रिझर्व्ह बॅंकेबरोबर काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी दिली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गतआठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या योजनेचा भाग म्हणून दोन बॅंकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला बॅंक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, बॅंकांमध्ये सरकारी ठेवी ठेवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. तसेच बॅंक खासगीकरणाबाबत तपशीलवार काम केले जात आहे. मी ही घोषणा केली आहे पण आम्ही आरबीआयबरोबर एकत्र काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मात्र, खासगीकरणासाठी निवडलेला उमेदवार कोणता असेल यासंबंधीच्या तपशीलांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार देत त्या म्हणाल्या, याबाबत जेव्हा सरकारचा निर्णय होईल तेव्हा यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात येईल. तसेच बॅंकांमध्ये व्यावसायिकतेची गरज आहे आणि ते निश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महामारीच्या सुरुवातीच्या काळानंतर आता बॅंका हळूहळू बाहेर पडत आहेत, असे त्यांनी सांगितले.