मुंबई – चालू आर्थिक वर्षामध्ये बॅंकांमधील गैरव्यवहारामध्ये तब्बल 73 टक्के वाढ झाली आहे. यावर्षीच्या गैरव्यवहारांमध्ये 71,543 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बॅंकांमध्ये 41,167 कोटींचे गैरव्यवहार झाले, असे मुख्य सरव्यवस्थापक जयंत दाश यांनी सांगितले.
या एकूण गैरव्यवहारांमध्ये 20 टक्के कारणांमुळे 80 टक्के परिणाम आढळून आले आहेत. 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे गैरव्यवहार एकूण गैरव्यवहाराच्या 1 टक्काच आहेत. मात्र त्यामुळे तिप्पट-चौपट नुकसान झाले आहे. बॅंकांमध्ये दरवर्षी सरासरी 35 हजार कोटींचे गैरव्यवहार होतात. यामध्ये गुंतवणूकदार आणि अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान गृहित धरलेले नसते. हे सहज लक्षात घेतले जात नाही.
2015 या आर्थिक वर्षात अशा गैरव्यवहारांमधून 1,74,798 कोटींचे नुकसान झाले. याच काळात प्रत्यक्ष गैरव्यवहार 82,959 कोटींचे झाले होते. पण नुकसानीचा आकडा 211 टक्के अधिक होता. बहुतेक गैरव्यवहारांमध्ये व्यवस्थापक टीमचाच हात असतो, असेही दाश यांनी सांगितले.