Bank of Maharashtra profit rises – थकीत कर्जाची वसुली वाढविण्यात यश मिळाल्यामुळे महाराष्ट्र बॅंकेचा तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद सुधारला आहे. या तिमाहीत बॅंकेचा नफा 14 टक्क्यांनी वाढून 154 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत बॅंकेला 135 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत बॅंकेचे उत्पन्न वाढून 3,577 कोटी रुपये इतके झाले आहे. बॅंकेने कर्ज वसुली मोहीम यशस्वी केल्यामुळे तिसऱ्या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 7.69 टक्क्यांवर आली आहे. मूल्यात ही अनुत्पादक मालमत्ता 8,072 कोटी रुपये इतकी आहे. गोल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 16.77 टक्के म्हणजे 15,746 कोटी रुपये इतकी होती.
त्याचबरोबर बॅंकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 2.59 टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 4,507 कोटी रुपये होती. ती आता 2,578 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे बॅंकेला केवळ 498 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. बॅंकेचा एकूण व्यवसाय 13.15 टक्क्यांनी वाढून 2,66,875 कोटी रुपये इतका झाला आहे.
जी खाती 31 ऑगस्ट 2020 पर्यंत एनपीए झाली नाहीत. त्यांचा समावेश ताळेबंदात एनपीए खाते म्हणून केला जाऊ नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र यासाठी अतिरिक्त 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.