पुणे – सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रने रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले.
पुणे येथील बॅंकेच्या मुख्यालयातील संसाधन नियोजन विभागाचे सरव्यवस्थापक विजय कांबळे, एकीकृत जोखिम व्यवस्थापन विभागाचे सरव्यवस्थापक अरुण कबाडे व बॅंकेच्या नवी मुंबई विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुरेंद्र देवकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी यानी रायगड जिल्ह्यातील खरवली, बिरवी आणि तळीये या महाड तालुक्यातील पुर व दरड आपत्तीग्रस्त गावांना भेट दिली.
पूरग्रस्त नागरिकांना अन्न पदार्थ, चादरी, टॉवेल, ब्लॅंकेट इत्यादी मुलभूत व जीवनावश्यक वस्तु वाटप कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे उपस्थित होत्या.
विजय कांबळे व अरुण कबाडे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. ज्ञानदा फणसे व पूरग्रस्त भागातील नागरिकांनी बॅंक ऑफ महाराष्टने घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या हितासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र आपले प्रयत्न यापुढेही सुद्धा सुरूच ठेवेल.