नवी दिल्ली-करोनाच्या संसर्गाच्या काळामध्ये बॅंक कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बॅंक कर्मचारी संघटनांनी सर्व शाखांचे सॅनिटायझेशन नियमितपणे करावे, 1 हजार रुपयाचा दैनंदिन भत्ता द्यावा, बॅंक कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमा द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स या संघटनेने अर्थ मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, संसर्गाच्या काळामध्ये 11 बॅंक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बॅंकांची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी मिळत नाहीत. यासाठी वेगळी व्यवस्था करावी, ग्राहकांवरील नियंत्रणासाठी सुरक्षाव्यवस्था द्यावी, ज्येष्ठ बॅंक कर्मचारी आणि महिलांना घरातून काम करण्याची परवानगी मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
बॅंक कर्मचाऱ्यांना कामावर येताना त्रास होतो. यासाठी प्रवासाची व्यवस्था करण्यात यावी. ज्या ठिकाणी करोनाचा प्रभाव जास्त आहे, अशा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसारख्या शहरांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्याच्या आधारावर काम करावे. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बॅंक कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी केली आहे.
संघटनेने म्हटले आहे की, करोनामुळे स्टेट बॅंकेच्या तीन, पंजाब नॅशनल बॅंकेच्या एक, फेडरल बॅंकेच्या एक, सेंट्रल बॅंकेच्या एक, बॅंक ऑफ इंडियाच्या दोन, आयडीबीआय बॅंकेच्या एक, कॅनरा बॅंकेच्या एक आणि महाराष्ट्र बॅंकेच्या एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.