वॉशिंग्टन – भारताचा विकासदर यावर्षी कोसळणार असल्यामुळे भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी होणार असल्याची आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने यावर्षी भारताचा विकासदर उणे 10.5 टक्के राहील, असे म्हटले आहे. नाणेनिधीने विकासदर उणे 10.3 टक्के असेल असे म्हटले आहे. जून महिन्यात नाणेनिधीने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न उणे 4.5 टक्के होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, दरम्यानच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घसरली आहे. त्यामुळे नाणेनिधीने आपल्या अंदाजात बदल केला आहे.
नाणेनिधीच्या हिशेबानुसार यावर्षी भारताचे दरडोई उत्पन्न कमी होऊन केवळ 1,877 डॉलर होणार आहे. तर बांगलादेशचे दरडोई उत्पन्न 1,888 डॉलर होणार आहे. मात्र, भारताचा विकासदर पुढच्या वर्षी वेगाने वाढून तो 8.8 टक्के होईल आणि पुढच्या वर्षी भारत हा जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. पुढच्या वर्षी चीनचा विकासदर 8.2 टक्के राहणार आहे.
सरकारच्या कर्तृत्वाचा परिणाम- राहुल गांधी
गेल्या सात महिन्यांत केंद्र सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने अर्थव्यवस्था हाताळल्यामुळे बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त होणार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या वर्षी भारताचा विकासदर जगातील इतर देशांपेक्षा कमी होणार आहे, असे ते म्हणाले.