ढाका: बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मानधनाच्या मुद्द्यावरून भारत दौऱ्यातून अंग काढून घेण्याचा इशारा देत संप केला आहे. खेळाडूंच्या बाजूने उभे राहताना बांगलादेश क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष हुसेन चौधरी यांनी थेट मंडळावर आरोप केले असून मंडळच सामने फिक्सिंग करते, असा धक्कादायक खुलासा केला.
मंडळच गेल्या काही काळापासून भ्रष्टाचाराला उत्तेजन देते तसेच काही खेळाडूंवर दबाव टाकून त्यांच्यामार्फत फिक्सिंग देखील करते, असे मत चौधरी यांनी व्यक्त केले आहे. याबाबतीत मी अनेकदा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.
नोव्हेंबरमध्ये बांगलादेशचा संघ भारतात येणार आहे, मात्र, आता त्यांच्याच मंडळात घडत असलेल्या काही गोष्टींमुळे मंडळ आणि खेळाडू यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.
त्यामुळे हा दौराच संकटात सापडला आहे. सोमवारी बांगलादेशच्या वरिष्ठ खेळाडूंनी पत्रकार परिषदेतच मंडळाला इशारा देताना संप करत असल्याचे जाहीर केले होते.