मुंबई – भारत सध्या आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचवेळी आपले शेजारी राष्ट्र, देखील त्याच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. मुंबईत उद्यापासून सुरु होणाऱ्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ मध्ये याच दोन्ही उत्सवांचे औचित्य साधत, यंदा, बांग्लादेशची “”कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, 11 बांग्लादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज, “कंट्री ऑफ फोकस’ अंतर्गत, मिफ्फ मध्ये दाखवले जाणार आहे. यात, समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट, हसीना- ए डॉटर्स टेल'( पिपलू खान दिग्दर्शित) चा देखील समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि जेष्ठ राजकीय नेत्या, शेख हसीना, यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.
त्याशिवाय, कंट्री ऑफ फोकस पॅकेजमधील इतर चित्रपट,बांगला मुक्ती संग्रामाच्या आठवणी ताज्या करणारे आहेत. बांगला भूमी स्वतंत्र करण्यासाठी, तिथल्या लोकांनी दिलेले बलिदान आणि 71 च्या युद्धाच्या आठवणी सांगणारे नॉट ए पेनी, नॉट ए गन, “जोलो गुरीला ” यांसारखे चित्रपट बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त करणाऱ्या 71 च्या युद्धाची कथा सांगत, बांगलादेशच्या नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत.
स्वातंत्र्यासाठी बांगलादेशच्या नागरिकांनी काय काय छळ आणि हालअपेष्टा सोसल्या, त्या वेदनांना ह्या चित्रपटांनी वाचा फोडली आहे. दिलारा बेगम जॉली यांनी दिग्दर्शित केलेल्या, जोथोरलिना ह्या चित्रपटात, बांग्लादेशी लेखिका, रोमा चौधरी यांनी, युद्धकाळात घालवलेल्या अत्यंत वेदनादायी आणि संघर्षमय आयुष्याची कथा सांगितली आहे. “कान पेटे रोई’ या माफिदुल हक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात, 1971 च्या युद्धकाळात झालेल्या अत्याचारांविरोधात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, एका गणिताच्या प्राध्यापकाची संघर्षमय कथा साकारली आहे.
सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपट, ज्यात, मध्यपूर्वेतून मायदेशी परतेल्या घरगुती कामगारांच्या व्यथा-वेदना, बांग्लादेशमधील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अशा विषयांवरील चित्रपटही आहेत. भारतीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे उपाध्यक्ष, आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे सचिव (आशिया-पॅसिफिक) प्रेमेंद्र मजुमदार यांनी या विभागासाठीच्या चित्रपटांची निवड केली आहे.