मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळूरविरुद्धचा आयपीएलमधील सामना खेळताना कायम मनावर दडपण येते. त्यांना पराभूत कसे करता येईल याची व्युहरचना तयार करण्यासाठी ड्रेसिंगरुममध्ये 2 ते 3 तास बैठक घ्यावी लागते, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने व्यक्त केले आहे.
आजपर्यंत झालेल्या आयपीएलच्या 12 स्पर्धांत संघात सर्वात बलाढ्य खेळाडू असूनही बंगळूरला विजेतेपद कधी मिळवता आले नाही याचेच मला आश्चर्य वाटते. त्यांच्या संघात कोहली, एबी डिवीलिअर्ससारखे जागतिक दर्जाचे फलंदाज असूनही त्यांना सातत्याने अपयशाचा सामना कसा करावा लागतो हेच कळत नाही. मात्र, असे असले तरीही त्यांच्याशी जेव्हा सामना असतो त्यापूर्वी आमची संघ बैठक जवळपास 2 ते 3 तास सुरु असते. स्पर्धेतील अन्य कोणत्याच संघाशी खेळताना दडपण येत नाही मात्र, बंगळूरशी खेळताना मनावर खूप ताण असतो, असेही रोहित शर्मा म्हणाला.
करोनाच्या धोक्यामुळे देशात लॉकडाऊन असल्याने सर्व खेळाडू आपापल्या घरातच असल्याने ते सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहेत. अशाच लाइव्ह चॅटवर सनराइझर्स हैदराबादचा कर्णधार व ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्याशी बोलताना रोहितने आपली मते मांडली.