नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाचे केले नेतृत्व
मोदी सरकारला दिले आव्हान
माझे सरकार बरखास्त करा किंवा मला तुरूंगात टाका
अंमलबजावणीसाठी माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल
कोलकता : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला तीव्र विरोध दर्शवत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. बंगालमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी भाजपकडून काही लोकांना पैसा देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
वादग्रस्त कायद्याला आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाला (एनआरसी) विरोध दर्शवण्यासाठी ममतांच्या नेतृत्वाखाली येथे त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने प्रचंड मोर्चा काढला. त्यावेळी बोलताना ममतांनी अतिशय आक्रमक पवित्रा स्वीकारला. मी जिवंत असेपर्यंत बंगालमध्ये तो काळा कायदा किंवा एनआरसीची अंमलबजावणी होऊ देणार नाही. अंमलबजावणी करायचीच असेल तर माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल.
भले मला तुरूंगात टाका किंवा माझे सरकार बरखास्त करा, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला आव्हान दिले. कायद्याला आणि एनआरसीला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाखों पत्रं पाठवा. प्रसंगी पत्र लिहिण्यासाठी शाईऐवजी स्वत:च्या रक्ताचा वापर करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. निदर्शनांना हिंसक स्वरूप न देण्याचे आवाहनही ममतांनी निदर्शकांना केले.