उत्तम पिंगळे
अगदी शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारे तिकीटवाटप अखेर पार पडले. यावेळी पावसाने जेवढा धुमाकूळ घातला तसा आता निवडणुकीचा धुमाकूळ सुरू झाला. सर्वच पक्षांतून आयाराम गयाराम सुरू झाले व अलीकडे ते एवढे वाढले की कोण कधी, कुठे जाईल हे सांगता येणे अशक्य झाले. मग ज्यांना तिकीट नाकारले त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंतही चित्र स्पष्ट होत नव्हते.
प्राध्यापक विसरभोळ्यांना यावर विचारले, तर ते म्हणाले की, बंडखोर व अपक्ष उभे राहणे खूप कठीण काम असते. मुख्य म्हणजे आपल्या पक्षाची मते मिळवणे जवळ जवळ नगण्य शक्यता मग स्वतःचे कर्तृत्व यात राजकीय, सामाजिक व अलीकडे जास्त आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरत आहे. पूर्वी बंडखोरी म्हणजे अगदी खरोखरच्या उमेदवाराला डावलले तर होत असे. आता दोन राजकीय पक्षांची वरच्या स्तरावर जरी युती असेल व एखादी जागा अमुक एक पक्षाला गेली असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातील इच्छुक आज ताबडतोब अपक्ष म्हणून फॉर्म भरून मोकळा होत आहे. अलीकडे या अपक्ष, बंडखोरांचे दोन भाग आहेत.
एक म्हणजे खरोखरच बंडखोर तर दुसरे खरोखरचे अपक्ष व संधिसाधू अपक्ष असे नाईलाजाने म्हणावे लागेल. खरोखरचे बंडखोर हे रास्त उमेदवारास नाकारून नवा वा परका उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांच्या खरोखरचा आग्रहाखातर निवडणूक लढवणारा उमेदवार होय. पण दुसऱ्या प्रकारात बंडखोराने युतीला व आघाडीत आपल्या मित्र पक्षाला जागा मिळाली व मला मिळाली नाही म्हणून अर्ज दाखल करून बंडखोरी करणे होय.असे झाल्याने अधिकृत उमेदवारास निवडणूक जड जाऊ शकते. कधी कधी हा बंडखोर इतका ताकदवान असतो की युती असूनही अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतो. अर्थात, याचे प्रमाण खूप कमी असते. अजूनही बहुतांशी मतदार पक्षाला मानणारे असल्यामुळे ज्याला पक्षाने उमेदवारी दिली त्याच्याच पारड्यात मग जास्तीत जास्त मतदान होते.
आता अपक्षांमध्येही एखादी व्यक्ती अशी असते की ज्याने समाजकार्य केलेले आहे व लोकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे व अधिक कर्तृत्ववान असून सर्वांना ती मान्य आहे व लोक अशा व्यक्तीला निवडून देतात. अर्थात अलीकडे हे प्रमाण खूपच कमी आहे. कारण अलीकडे मोठ्या राजकीय पक्षांचे पाठबळ असल्याशिवाय मोठी कामेही करता येत नाहीत. काही अपक्ष केवळ नाव साधर्म्य असल्याचा फायदा करून घेण्यासाठी येतात. यात विरोधी गटाचा प्रामुख्याने हात असतो जेणेकरून त्या उमेदवाराची मते विभागली जावीत.
उदा. एखाद्या राजकीय पक्षात “क्ष’ नावाची व्यक्ती उभी राहिली आहे तर विरोधी गट “क्ष’ नाव असणाऱ्या अनेक जणांना फॉर्म भरावयास प्रवृत्त करतात जेणेकरून खऱ्या “क्ष’ च्या मतांची विभागणी व्हावी आणि कित्येक वेळा असे डुप्लिकेट “क्ष’ हजारोंमध्ये मते खाऊन जातात. दुसरा अपक्ष याच प्रकारात पण स्वत:हून अर्ज भरतो. उगाचच आपण उमेदवार म्हणून उभे आहोत हे दाखवण्यासाठी अर्ज भरतो. मग अशी व्यक्ती जर थोडी वलयांकित असेल तर कित्येक वेळेला सत्ताधारी व विरोधी गटही अशा व्यक्तीला काही आमिषे दाखवून अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करते. जेणेकरून आपल्या मतांची हानी होऊ नये. अलीकडची निवडणूक पद्धती पाहता अपक्ष उभे राहणे कठीण काम असून तेथे प्रचंड पैसा लागत आहे व कित्येक वेळा असा पैसा ओतूनही हाती काही लागत नाही. म्हणूनच जे काही मिळत असेल ते पदरात पाडून बरेचसे बंडोबा थंडोबा होत चालले आहेत.