शिक्रापूर – येथे पुणे-नगर महामार्गावरून वाहणारी वेळ नदी ऐन उन्हाळ्यामध्ये तहानलेली असून, या नदीवर असलेले सर्व बंधारे पूर्णपणे कोरडे पडलेले असल्याने या भागातील विहिरी, तसेच विंधन विहिरींची देखील पातळी खालावली आहे, त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला असल्याने वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यावर शिक्रापूर, जातेगाव, तळेगाव ढमढेरे येथील अनेक वाड्या-वस्त्यांवरील शेतीचे, तसेच नागरिकांचे पाण्याचे स्रोत अवलंबून आहेत. येथील नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते, त्यामुळे नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होत असून, पिण्याच्या पाण्याची सोय होते.
या नदीचे बंधारे भरलेले असल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी वाढलेली असल्यामुळे ग्रामस्थांना योग्य पाणी वाटप होते; परंतु सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असून या नदीवर असलेले शिक्रापूर परिसरातील तीन बंधारे देखील कोरडे पाडले आहे.
उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असल्यामुळे आता नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे, त्यामुळे वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.