ढाका – भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा ( BAN vs IND ) सामना आज ढाका येथील शेर ए बंगला स्टेडियमवर खेळला गेला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून एक विकेटच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या सामन्यातदेखील भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. सामन्यातील या पराभवामुळे भारताने एकदिवसीय मालिका देखील गमावली आहे. भारताचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध ५ धावांनी पराभव झाला. यासोबतच यजमान संघाने ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!
सामन्यात बांगलादेशने दिलेल्या २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर नंतर श्रेयस अय्यर (८२ धावा) आणि अक्षर पटेल (५६ धावा) यांनी डावाला सावरले. मात्र यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर हे बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा विजय अवघड झाला. रोहित शर्माला अगोदरच दुखापत झालेली होती. शेवटी मैदानात येऊन रोहित शर्माने भारतीय संघाच्या विजयच्या आशा जिवंत केल्या. त्याने फटकेबाजी करत २८ चेंडूत ५१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एका षटकाराची आवश्यकता होती. मात्र त्या चेंडूवर एकच धावा मिळाली आणि भारताने ५ धावांनी हा सामना गमावला.
गोलंदाजीत भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आणि यजमान संघाच्या वरच्या फळीतील सर्वच फलंदाजांना एकापाठोपाठ बाद केले. त्यानंतर मात्र खालच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजीला कडवे आव्हान दिले. सामन्याच्या १९व्या षटकात बांगलादेशचे अवघ्या ६९ धावांवरच ६ गडी तंबूत परतले होते. मात्र त्यानंतर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांनी संघाला सावरले आणि १४८ धावांची भागीदारी रचली. बांगलादेश संघ आता लवकरच सर्वबाद होईल असे वाटत असताना या दोन फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीच्या बळावर यजमान संघ मजबूत स्थितीत पोहोचला.
महमुदुल्लाह याने ९६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी खेळली तर मेहदी हसन याने ८३ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी खेळली. त्यामुळे यजमान संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने दमदार कामगिरी करत १० षटकांत ३७ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तसेच मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.