चेन्नई – तामीळनाडूतील एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नव्हे तर, राहुल यांना तामीळनाडूत प्रचार करण्यास मनाई करण्याची मागणीही त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
कन्याकुमारी जिल्ह्यात राहुल यांनी 1 मार्चला एका शाळेला भेट दिली. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. शैक्षणिक संस्थेतील राजकीय प्रचार आचारसंहितेचा भंग करणारा आहे. राहुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना आणखी एका स्वातंत्र्य लढ्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना द्यावा, असेही साकडे भाजपने घातले आहे.
देशातील सध्याची स्थिती ब्रिटीश राजवटीतील काळासारखी आहे. त्यामुळे आणखी एक स्वातंत्र्य लढा देण्याची गरज असल्याचे राहुल विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले, याकडे भाजपने लक्ष वेधले आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने तामीळनाडूत आचारसंहिता लागू झाली आहे. त्या राज्यात निवडणुकीसाठी 6 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होईल.