नवी दिल्ली – प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून जगभरातील प्लॅस्टिक प्रदूषणामुळे संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक वेळा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.
आता पर्यावरण मंत्रालयाने एकेरी वापरातील प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2022 पासून करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 अधिसूचित जारी केली आहे. त्यानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापरातील प्लॅस्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पॉलिस्टीरिन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरातील प्लॅस्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असणार आहे. एकेरी वापराच्या प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच प्लॅस्टिक कॅरी बॅगची जाडी 30 सप्टेंबर 2021 पासून 50 मायक्रॉनवरून 75 मायक्रॉन करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2022 पासून ही जाडी 120 मायक्रॉन केली जाणार आहे. सध्या देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.
दरम्यान, सरकारच्या “स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा आधीच तयार केली जात आहे. याशिवाय, सरकार प्लॅस्टिकच्या वापराबाबत जनजागृती कार्यक्रम देखील राबवत आहे.
या वस्तूंचा समावेश
ध्वज, फुगा, आईसक्रिम आणि कॅंडीसाठी वापरत असलेल्या प्लॅस्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लॅस्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.