मटण विक्रेत्या संघटनेची मागणी : मटण विक्रीचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांकडे नेणार
स्थानिकांचा व्यवसाय हिरावतोय
पुणे – मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला हिरवा चारा, पोषक हवामान या कारणांमुळे चविष्ट मटणासाठी महाराष्ट्राचे बोकड प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच देश आणि विदेशांतून बोकडांना मागणी वाढली आहे. परराज्यांतील व्यापारी अधिकच्या दराने बोकडांची खरेदी करीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मटणाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच यंदा अतिवृष्टी, रोगराईमुळे बोकडांची संख्या घटली आहे.
एकीकडे परराज्यांतून होणारी मागणी आणि दुसरीकडे बोकडांचा तुटवडा आदी कारणांमुळे राज्यातील मटण विक्रेते आणि व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे परराज्यांतील व्यापाऱ्यांना राज्यातून बोकड खरेदीकरण्यास बंदी घाला, अशी मागणी राज्यातील मटण विक्रेत्या संघटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत.
विशेषत: पुणे जिल्ह्यात चाकण, घोडनदी, तळेगाव ढमढेरे, लोणी, पाबळ, कुंजीरवाडी येथे बोकडांचा बाजार भरतो. तर उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथूनही बोकडे बाजारात विक्रीसाठी येत असतात. मात्र, राज्यातील बोकडांनाच सर्वाधिक मागणी असते. स्थानिक बोकडांचे मटण लाल असते, तर परराज्यातील बोकडांचे मटण पांढरट असते. पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान किलोचा दर आहे. तर बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, आंध्र प्रदेश, कोलकत्ता यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांत मटणाचे किलोचे दर 700 रुपयांपेक्षा अधिक आहेत. अधिकच्या दराने बोकडांची खरेदी करून त्याची विक्री करणे मटण विक्रेत्यांना परवडत नाही. त्यात चेन्नई येथील बोकडाच्या कातडीची खरेदी करणारे कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे 250 ते 300 रुपयाला विकले जाणारे बोकडाचे कातडे मागणी अभावी अवघ्या 50 ते 60 रुपयाला विकावे लागत आहेत. त्याचा फटकाही मटण विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे चहूबाजूने मटण विक्रेते अडचणीत सापडले आहेत.
परराज्यांतील बोकड खरेदीदारांवर बंदी घालण्याची मागणी करणार आहोत. त्यासाठी उद्या (शुक्रवार) गुरुवार पेठेतील लक्ष्मी बाजार येथे मटण विक्रेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील मटण विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तारीख ठरविली जाणार आहे.
– प्रकाश कांबळे, अध्यक्ष, पुणे मटण दुकानदार असोसिएशन