डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी
पुणे – प्राण्यांनाही सुखाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र, मनोरंजन आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्राण्यांच्या शर्यती लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. नुकतेच सणसर येथे कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये कोंबड्या आणि कुत्र्यांना अतिशय क्रूरतेने हाताळले गेले. त्यामुळे कुत्र्यांच्या (श्वानांच्या) शर्यतींवर केंद्र आणि राज्य सरकारने तत्काळ बंदी घालावी. तसेच हौस म्हणून अशा शर्यती भरवणाऱ्या शौकिनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.
मनोरंजन आणि स्पर्धांसाठी प्राण्यांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यानंतर आता कुत्र्यांच्या शर्यती भरविण्याचे प्रकार घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या इचलकरंजीत सायको रेसिंग क्लबने अशाचप्रकारे कुत्र्यांच्या स्पर्धा भरविल्या होत्या. तेथेही “ब्यूटी विदाऊट क्रुएल्टी’च्या अध्यक्षा डायना रत्नागर यांच्या मदतीने या शर्यती थांबवल्या. आता पुणे जिल्ह्यातील सणसरमध्येही या कुत्र्यांच्या शर्यती भरविण्यात आल्याचे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.
प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 (प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमल्स ऍक्ट 1960) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (महाराष्ट्र स्टेट प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट) या कायद्यानुसार या शर्यती बेकायदेशीर आहेत. कुत्र्यांच्या शर्यती भरविण्यावर या दोन्ही कायद्यांप्रमाणे कारवाई केली जावी. केंद्र आणि राज्य सरकारने कुत्र्यांच्या शर्यतीवरील निर्बंध कडक करावेत आणि कुत्र्यांच्या शर्यतीचे हे लोन पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ. गंगवाल यांनी केले.
या कुत्र्यांना शर्यतीसाठी तयार करताना ससे, उंदीर, कोंबड्या, जंगली डुक्कर अशा इतर जिवंत प्राण्यांचाही बळी दिला जातो. या कुत्र्यांना उपाशी ठेवून सावजांचा पाठलाग करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कुत्र्यांच्या ओळखीसाठी त्यांचे कान गोंदले जातात. शर्यतीनंतर या कुत्र्यांचे कान कापून टाकले जातात. शिवाय उपयोग संपल्यावर या कुत्र्यांना बेवारस सोडून दिले जाते. कुत्र्यांची शर्यत म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. त्यामुळे अशा गोष्टींना आपण प्रोत्साहन देता कामा नये, असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.