नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत टिकटॉक, शेअरइट, वुईचॅटसह 59 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली. त्यातून भारताने चीनला जोरदार डिजिटल दणका दिल्याचे मानले जात आहे. यावर आता चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हंटले कि, चीन याबाबत चिंतेत असून परिस्थितीची पडताळणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
China is strongly concerned, verifying the situation: Chinese Foreign Ministry spokesperson Zhao Lijian on India banning Chinese apps (file pic) pic.twitter.com/XUbeZpSl6i
— ANI (@ANI) June 30, 2020
दरम्यान, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व यांच्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपायकारक ठरू शकणाऱ्या अॅप्सवर बंदी घालत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये यूसी ब्राऊजर, हॅलो, लाइकी, क्लब फॅक्टरी, न्युज डॉग, यूसी न्युज, वीबो, जेंडर आदींचाही समावेश आहे. संबंधित अॅप्सवरील बंदीमुळे मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण होईल. त्या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. संबंधित अॅप्स वापरणाऱ्यांच्या डेटाची चोरी केली जात आहे, अशा अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे बंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
संबंधित अॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालय आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडूनही करण्यात आली होती. चीनकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या कुरापतींमुळे सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे देशात चीनविरोधात संतापाचे वातावरण आहे. अशात अनेक अॅप्सवर बंदी घालून भारताने त्या देशाला कठोर संदेश दिला आहे.