पुणे- मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणूक घेण्याऐवजी कार्यकारिणीच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्याच्या निषेधार्थ माधव राजगुरू यांनी अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला गेला नाही तर, कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा राजगुरू यांनी दिला आहे.
संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आगामी निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे विषयपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन वर्षे वाढवून देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाला विरोध करून मी विषयपत्रिकेनुसार कामकाज करण्याचा आग्रह धरला. मात्र, तरीही कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन नवीन सभासदांना कार्यकारिणीवर काम करण्याची संधी नाकारून संस्था स्वत:च्या ताब्यात ठेवण्याची ही कृती सभासदांच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. त्यामुळे मी संस्थेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे राजगुरू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
करोनाकाळात शाळा सुरू नसल्याने वाया गेलेला कालावधी लक्षात घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेने अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय बहुमताने घेतला आहे. सभेचा आदेश लक्षात घेऊन संस्थेचे कामकाज सुरू राहील.
– डॉ. संगीता बर्वे, अध्यक्ष, (अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था)