नगर -केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेस राज्यभरातच फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यंदा पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेण्याकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यात फक्त 2 लाख 30 हजार 87 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत संपली आहे. राज्यभरातही फक्त 96 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत योजना सुरू केली. योजनेच्या जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च केले. विमा कंपन्यांची नियुक्ती केली. कंपन्यांनी स्थानिक पातळीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कंपनी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतरही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यात अवघ्या 2 लाख 30 हजार 087 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत. राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. राज्यात फक्त 96 लाख 60 हजार 530 शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात मागील खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा सहभाग 23 टक्क्यांनी घटला आहे.
यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडला असून पाण्याची काळजी मिटली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता हाच पाऊस त्रासदायक ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या नगर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात 1319 हेक्टर आणि सप्टेंबर महिन्यात 6 हजार 715 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यात 96 लाख शेतकऱ्यांचे अर्ज
राज्यातील कोकण विभागात 84 हजार 838, नाशिक विभागात 433520, पुणे विभाग 430344, कोल्हापूर विभाग 35316, औरंगाबाद विभाग 3157902, लातूर विभाग 3629617, अमरावती 1591209 आणि नागपूर विभागात 2 लाख 97 हजार 784 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.