राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर – शेतीमध्ये अत्यावश्यक असलेल्या खते, औषधे, बी – बियाणे यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुरुष व महिला शेतमजुरांच्या मजुरीतही अवास्तव वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता हैराण झाला आहे. तर दुसरीकडे लहरी हवामान व शेतमाल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांनीही बळीराजाची पिळवणूक सुरुच ठेवली आहे.
मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेले सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत. राजकारण्यांना त्यांच्या सत्तेच्या संगीत खुर्चीच्या नवनवीन प्रयोगांमुळे अतिवृष्टी, दुष्काळ, महागाईच्या खाईत सापडला आहे. दररोज नवीन घडणाऱ्या राजकीय घडामोडीत शेतकरी दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसताना शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. खते, औषधे, बी – बियाणे यांच्या किमतींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एक एकर नांगरणीसाठी चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुहेरी फणणीसाठी अडीच हजार रुपये, पाळी किंवा सारे काढण्यासाठी साडेबाराशे रुपये, रान ओढण्यासाठी तीन हजार रुपये लागत आहेत. त्यापुढील खर्च कोणते पीक करावयाचे त्यावर अवलंबून आहे. बी – बियाण्याचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
पीक चांगले यावे म्हणून शेणखत, कोंबडीखत किंवा कचराखत टाकायचे म्हटले तर एकरी तीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च येत आहे. खुरपणीच्या मजुरीचा दर हा अडिचशे रुपयांवर पोहोचला आहे. तणनाशकांच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यातच तणनाशकांच्या वेगवेगळ्या कंपन्या बाजारात आल्या असल्याने चांगल्या कंपन्यांच्या औषधांच्या किमती जास्त आहेत. तसेच तणनाशकांनी गवतच जळत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. खते, औषधे, कीटकनाशके यामधूनही फसवणूक होत आहे. ही औषधे दुय्यम दर्जाची मिळत आहेत. एकूणच शेतकरी कर्जबाजारी होत असून त्याला घर, प्रपंच चालवणे कठीण होऊन बसले आहे.
एजंट मालामाल आणि शेतकरी कंगाल
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर एजंटगिरीची मोठी साखळी निर्माण झाली आहे. बाजारात सुद्धा एजंटा शिवाय मालाची विक्री होत नाही असे भयानक वास्तव आहे. एजंट मालामाल आणि शेतकरी कंगाल अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांची मोठी लूट खुलेआम सुरू आहे. शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज असून केंद्र व राज्य सरकारने शेतकरी केंद्रबिंदू मानून धोरण आखण्याची गरज आहे.
महागाई दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अशी अपेक्षा बळीराजा करत आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या राजकीय खेळात कोणीही बळीराजाचा विचार करताना दिसत नाही, याबाबत राज्यसरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
– दादासाहेब वलठे, शेतकरी लोणी काळभोर