मुंबई: नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे. या सरकारला कुठलेही धोरण वा दिशा नसल्यामुळे आर्थिक आणीबाणी ओढवली आहे, त्यातूनच कर्जाचा बोजा वाढला आहे. खरे तर मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी देशावरील कर्जाचा बोजा वाढल्याचे म्हटले होते. तसेच देशावरील कर्जामध्ये ७१ टक्क्यांनी वाढ झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. कर्जात ३७.९ लाख कोटींची वाढ (७१.३६ टक्के) झाली. म्हणजेच प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ४१,२०० रुपयांवरून ६८,४०० रुपयांवर गेले. कर्ज प्रति माणशी २७,२०० रुपयांनी वाढले. साडेपाच वर्षांमध्ये प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ६६ टक्के म्हणजे दरवर्षी १०.३ टक्क्य़ांनी वाढले.