संगमनेर: समन्यायी पाणीवाटप कायदा झाला, तेव्हा राधाकृष्ण विखे मूग गिळून गप्प का होते? त्यांना जर खरोखरच कळवळा होता, कायद्याचे तोटे माहित होते, तर त्यांनी विरोध का केला नाही?”समन्यायी’च्या वेळी मी कृषिमंत्री होतो, हा कायदा मी मांडलेला नाही, अशा शब्दात माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर पलटवार केला.
आ. थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विखेंचा जोरदार समाचार घेतला आहे. राजकीय फायदा आणि सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करावा, हा विनोद आहे. जनतेच्या मनात विखेंच्या तडजोडीबद्दल तिरस्कार आहे. प्रत्यक्ष प्रचाराला लागल्यावर विखे यांना याची जाणीव झाली, जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील विखेंना विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे विचलित झालेल्या विखेंना पुन्हा माझी आठवण झाली. आज त्यांच्या पायाखालची जमीन सारकलेली आहे. त्यामुळे ते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. त्याकडे जिल्ह्यातील जनतेने दुर्लक्ष करावे, असाही चिमटा थोरतांनी काढला.
आ. थोरात म्हणाले, विखेंची सत्तेची हाव संपूर्ण राज्याने बघितलेली आहे, विरोधीपक्षनेते असतांना भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी सत्तेला विरोधाची भाषा करू नये. त्यासंदर्भात आपली कीर्ती जगजाहीर आहे. मी कधीही पदाची अपेक्षा ठेवली नाही, काम करत राहिलो. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरीत्या निभावली, असेही थोरातांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते आता कोठे
कॉंग्रेस पक्ष भाजप-शिवसेनेविरोधात आज आरपराची लढाई लढत आहे. पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या लढाईत सर्वस्व झोकून पक्षाचे काम करतोय. अशावेळी विरोधीपक्षनेते कोठे आहेत? आजच्या या संघर्षात त्यांचे योगदान काय? विखे यांच्यावरील जनतेचा विश्वास संपला आहे, असा दावा थोरात यांनी केला आहे.