विठ्ठल लांडगे
नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारात दोन वेळा राज्यमंत्री आणि चार वेळा कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेणारे ज्येष्ठ नेते, सध्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात खरेतर महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत संवेदशील व मितभाषी नेतृत्व. सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्वास संपादन केल्यानेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेतृत्वाची संधी मिळाली. अत्यंत शांत व संयमी नेत्याचा आज वाढदिवस. त्यांना प्रभात परिवाराच्या भरभरुन शुभेच्छा…!
खरेतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवातच पेचातून झाली. वडील दिवंगत भाऊसाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे निष्ठवान कार्यकर्ते. मात्र, त्यांना डावलून उमेदवारी अन्य कुणालातरी देण्यात आल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाळासाहेब थोरात यांच्या पहिल्या उमेदवारीचा विषय समोर आला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पहिली निवडणूक अपक्ष लढविली. त्यात अॅड. विजय भाऊसाहेब थोरात यांनी दणदणीच विषय मिळविला. हेच नेतृत्व पुढे बाळासाहेब थोरात नावानेच राज्यात प्रसिद्धीला आले.
स्वतःचे गाव असलेल्या जोर्व्यात 1979 मध्ये स्थापन केलेली अमृतवाहिनी सहकारी दूध संस्था, विडी कामगार आणि शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनामुळे 1980 मध्ये झालेला नऊ दिवसांचा तुरुंगवास आणि भंडारदरा धरणाच्या पाण्यासाठी सुरू केलेली चळवळ, अशा कामगिरीवरच विधानसभेच्या आखाड्यात त्यांनी बाजी मारली. 1985च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून बाळासाहेब थोरात यांनी प्रतिस्पर्ध्यावर 10 हजार मतांच्या फरकाने बाजी मारली.
काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यात वर्षानुवर्षेे थोरात व विखे गटांत विभागला गेलेला. त्यातून निर्माण होणारा संघर्ष अनेकदा टोकला पोचला. परंतु, अशाही परिस्थितीत बाळासाहेबांनी आपली राजकीय पकड कधीच ढिली पडू दिली नाही. सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे, दोनदा राज्यमंत्री अन् चारदा कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे कायम सदस्य, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ गटनेते आणि काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटविणारे बाळासाहेब थोरात यांचा दबदबा कायम राहिला.
संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी बाळासाहेबांनी दोन पावले मागे जाण्याची तयारी देखील ठेवल्याचे नगरकरांनी अनेकदा पाहिले. तत्कालीन पक्षांतर्गत विरोधक असलेले व विद्यमान भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांनी विकासाच्या मुद्यावर जुळवून देखील घेतले. श्रेय तुम्ही घ्या, पण विकासकामांत खोडा नको, अशी भूमिकाही त्यांनी काहीवेळा मांडली.
काँग्रेसच्या संस्कृतीत अक्रस्ताळेपणा कधीच चालत नाही. त्यामुळे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला मोठी मेहनत व संयम ठेवावा लागेल, हे सांगणे न लगे. मात्र, अशाही वातावरणात महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे वेगळे व स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले आहे, हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल. विशेष म्हणजे, बाळासाहेब आठ वेळा आमदार झाले. पाटबंधारे, कृषी आणि महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद त्यांनी सांभाळले. अशा खात्यांची मंत्रिपदे सांभाळणार्या काही नेत्यांना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला.
तथापि, बाळासाहेबांच्या स्वच्छ चारित्र्याने त्यांच्यावर कधीही गैरव्यवहाराचे आरोप झाले नाहीत. कसलाही शिंतोडा अद्यापर्यंत बाळासाहेब यांच्या अंगावर उडविण्याचे धाडस कुणी केले नाही. हेच त्यांच्या राजकीय यशाचे गमक असून, गांधी घराण्याच्या विश्वासाचेही महत्त्वाचे कारण ठरले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी लातूर, उस्मानाबाद आणि अगदी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरचेही पालकमंत्रिपद यशस्वीरीत्या सांभाळले. गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार निवड समितीचे प्रमुख म्हणून आणि हिमाचल प्रदेशात निरीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
विशेष म्हणजे त्यातील यश डोळ्यांत भरणारे ठरल्यानेच पक्षाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार उभारणीच्या कामाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर टाकली. त्यातही बाळासाहेब यांनी मोलाची कामगिरी केली. आजही सरकार टिकविण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे, यात कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संगमनेर येथील प्रचारसभेनंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी थोरात यांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेले छायाचित्र स्वतः ट्वीट केले. हा मोठाच कौतुकाचा विषय ठरला. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना रोखण्यासाठी पक्षाचीही खेळी असावी, असाही अनेकांना संशय वाटला. मात्र, त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांच्यावरील विश्वास व पक्षाच्या नेतृत्वाची महाराष्ट्रातील जबाबदारी याच खांद्यावर राहील, असे सष्ट संकेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले होते. त्यातूनच थोरात यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा अंदाज जाणकारांना आला होता.
विशेष म्हणजे, त्याचवेळी बाळासाहेब थोरात गांधी यांच्या निकटच्या वर्तुळात दाखल झाले असल्याचे ते प्रमाण आहे, हे देखील स्पष्ट झाले होते. त्यातूनच नंतर विधानसभा निवडणुकीआधीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा थोरात यांच्या खांद्यावर आली. त्यात थोरात यांच्या नेतृत्वाचा कस लागला. तो त्यांनी सिद्धही करुन दाखविला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस पक्षाला त्यांनी तब्बल 44 जागा जिंकून दिल्या.
त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची राज्यात सत्ता स्थापन करण्याचे निश्चित झाले. तेव्हाही बाळासाहेब थोरात यांच्याकडेच नव्या सरकारात महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय हायकमांडने घेतला. हा निर्णय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मिळविलेल्या यशाची पावतीच होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेल्या बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या विकासाकडेही तेवढेच जातीने लक्ष घातले. प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी थोरात यांचे प्रयत्न खूप महत्त्वपूर्ण ठरले. मात्र, त्यातही कायम श्रेयवादाचाच विषय समोर आला.
तथापि, बाळासाहेबांनी त्यातही श्रेयासाठी कधीच आकांडतांडव केल्याचे ऐकिवात नाही. विकासकामे आणि लोकांचे पुनर्वसन महत्त्वाचे असल्याचेच त्यांनी प्रत्येकवेळी ठासून सांगितले. धरणातून थेट संगमनेर शहरासाठी जलवाहिनी टाकून शहराचा पाणीप्रश्न थोरात यांनी कायमचा मिटवून टाकला. जोर्वे येथे अमृतवाहिनी सहकारी दूध उत्पादक संस्था थोरात यांनी 1980 मध्येच स्थापन केली होती.
पुढे संगमनेर तालुका सहकारी दूध संघ आणि थोरात सहकारी साखर कारखान्यासह सर्व सहकारी संस्थांवर थोरातांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्या माध्यमातून संगमनेरचे राजहंस दूध आणि दुग्धोत्पादने देशभरातील बाजार व्यापून आहेत.
कृषी, अभियांत्रिकी आणि दंतवैद्यकसह विविध महाविद्यालयांचे जाळे संगमनेरभोवती विणले. थोरात यांचे दंडकारण्य अभियान राज्यभर कौतुकाचा विषय ठरला. त्यामुळे विकासाचे राजकारण करणार्या या नेत्याला प्रभात परिवाराच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..!