यशवंतनगर – सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी कोरेगावचे माजी उपसभापती कांतीलाल भोसले- पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली.
कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी विरोधकांच्या अपप्रचार, खोट्या घोषणांवर तसेच कारखान्याच्या कर्जविषयी पसरवलेल्या अफवांवर जोरदार प्रतिक्रीया दिली.
पाटील म्हणाले, “विरोधकांनी खालच्या स्तरावर टीका केली, परंतु, सभासदांनी मतदानातून स्पष्ट व चोख उत्तर दिले. निवडणूक पारदर्शक झाली असून सभासदांचा विश्वास आमच्यावर असल्याचे मतांनी सिद्ध झाले आहे.”
“विरोधकांना खरोखर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलून, बॅलेट पेपरद्वारे पुन्हा निवडणूक लढवावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन झाली. यावेळी माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, सुरेश माने, संगीता साळुंखे, लक्ष्मी गायकवाड यांच्यासह आजी- माजी संचालक उपस्थित होते. लालासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कांतीलाल पाटील यांनी आभार मानले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि पी. डी. पाटील यांची भूमिका आम्ही जनतेपर्यंत पोहोचवली. मतदारसंघातील सभासदांनी अपप्रचार करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवला.” पी.डी. पाटील पॅनेलला ६० टक्क्यांहून अधिक मतदान मिळाले. सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी या निवडणुकीत मोलाची साथ दिली.
सह्याद्री कारखान्याचे प्रशासन अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध असल्याचे सांगत उपाध्यक्ष कांतीलाल पाटील यांनी “सह्याद्री पॅटर्न” राज्यात आदर्श ठरत असल्याचे नमूद केले.
सह्याद्रीच्या प्रशासनाला ५१ वर्षांची परंपरा आहोत असल्याच्या निमित्ताने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जशराज पाटील मित्रमंडळाच्यावतीने तब्बल ५१ फूट लांब हार घालून सत्कार करण्यात आला.