कोलकता – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद भुषवणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, गांगुलीने आणखी चर्चांना तोंड फुटू नये याची दक्षताही घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही चांगले संबंध असल्याची ग्वाही त्याने दिली. त्यातून मुरब्बी राजकारण्याला शोभेल असे बॅलन्सिंग ऍक्ट त्याने केल्याचे मानले जात आहे.
शहा शुक्रवारी बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते रात्री कोलकतास्थित सौरभच्या निवासस्थानी पोहचले. सौरभ आणि त्याच्या कुटूंबीयांसमेवत शहा यांनी भोजन केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सौरभने भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी त्या पक्षाकडून जोरदार प्रयत्न झाल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या.
त्यामुळे शहा आणि सौरभ यांच्या भेटीचे महत्व वाढले. मात्र, त्या भेटीचे स्वरूप राजकीय नसल्याचे सौरभने नमूद केले. मी शहांना 2008 पासून ओळखतो. त्यामुळे त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले, असे त्याने म्हटले. शहा यांचे पुत्र जय यांच्यासमवेत बीसीसीआयमध्ये काम करत असल्याकडेही त्याने लक्ष वेधले. जय शहा सध्या बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
अमित शहा हे सौरभच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आधीच उघड झाली होती. त्यामुळे त्या घडामोडीआधी ममतांनी मिश्कील टिप्पणी केली. शहा आणि सौरभ यांच्या भेटीत वावगे काय आहे? शहांना रसगुल्ले आवडतात. त्यामुळे भरपूर रसगुल्ले आणून ठेवण्याची विनंती मी सौरभला करते, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
शहा यांनी सौरभच्या निवासस्थानी भोजन केल्यासंबंधी रसभरीत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सौरभने ममतांशी खूप चांगले संबंध असल्याचे शनिवारी एका कार्यक्रमावेळी बोलून दाखवले. त्या कृतीतून सौरभने छान समतोल साधल्याचे निरीक्षण एका राजकीय विश्लेषकाने नोंदवले. सौरभ उत्तम बिझनेसमन आहे. एकाच वेळी तो केंद्र आणि राज्य सरकारांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील दिसतो, असे त्या विश्लेषकाने म्हटले.