मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना 50 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट चांदिवाल आयोगाने जारी केले आहे. दोन वेळा दंड ठोठावूनही आयोगापुढे हजर न राहणाऱ्या परमवीर सिंह यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. त्यानुसार हे वॉरंट जारी करण्यात आले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिले असल्याचा आरोप परमवीर सिंह यांनी केला होता. त्या आरोपात तथ्य आहे का? हे तपासण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती.
आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना हे वॉरंट जारी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. या अगोदर आयोगासमोर गैरहजर राहिल्याबद्दल आयोगाने परमबीर यांना तीनदा दंड ठोठावला आहे. तिसऱ्या अनुपस्थितीनंतर, परमबीर सिंग यांना 25,000 रुपये दंड करण्यात आला, जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोविड 19 च्या निधीमध्ये जमा करण्यास सांगितले गेले. आता चौथ्यांदा अनुपस्थितीनंतर 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
याआधी परमबीर सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आयोगाने आता परमबीर सिंहाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणीमध्ये आयोगासमोर हजर न राहिल्यास वॉरंट काढण्याचे आदेश देण्यात आले होते.