पुणे – जमीन व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना तिच्या नोंदीला हरकत घेऊन 15 लाख रुपये खंडणी उकळल्या प्रकरणात स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन यासह सद्दाम ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
पुराव्यात ढवळाढवळ करायची नाही, पोलिसांना तपासास सहकार्य करण्याच्या अटींवर लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. देशपांडे यांनी हा जामीन दिला. याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय 26, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मोहन बहिरट यांचे आजोबा सदाशिव कामठे यांनी शेवाळवाडी येथील जमीन नोव्हेंबर 2015 मध्ये विक्रीसाठी काढली होती. त्याचा संजय हरपळे यांच्याबरोबर व्यवहार झाला होता. त्यावेळी आरोपी सद्दाम याने माझ्यामार्फतच व्यवहार करायचा, नाही तर व्यवहार होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा भीतीपोटी कामठे याला हरपळे यांनी 2 लाख 70 हजार रुपये दिले.
मात्र, तरीही या व्यवहाराची नोंद 7/12 वर होऊ नये, म्हणून त्याने हरकतीचा अर्ज करून सदाशिव कामठे व हरपळे यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली. त्यातील 5 लाखांचा धनादेशदेखील घेतला. त्यानंतर त्याने हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी करून 15 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी बचाव पक्षाच्या वतीने ऍड. मानस शिंदे, ऍड. आलोक गायकवाड, ऍड. विनोद रासकर, ऍड. राजाभाऊ देशपांडे न्यायालयात अर्ज केला.