नगर -देशभरात मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर तसेच महिलांवर होत असलेले सामूहिक अत्याचार, बलात्कार, हत्या, मॉबलिंचींग व इतर घटनांचे वाढत्या प्रमाणाला विरोध व निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवार दि.15 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनी केले आहे. या मोर्चास बहुजन मुक्ती पार्टीसह इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी उच्चवर्णीय समाजातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मोदी व योगी सरकारच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, जातिभेद वर्णद्वेषातून संपूर्ण देशात सामूहिक अत्याचार, हत्या, बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा विरोध व निषेध करण्यासाठी या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंदोलन संपूर्ण देशात 31 राज्यात 550 जिल्ह्यात चार टप्प्यांमध्ये होत आहे. या शृंखला आंदोलनांतर्गत दुसऱ्या टप्प्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. त्यानंतर मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माळीवाड्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा बंगाल चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असल्याचे संघटनेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास दि. 30 ऑक्टोंबर रोजी संपुर्ण देशात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.