विक्री नसल्याने शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत; “एफआरपी’ची रक्कम 18 हजार कोटींवर
पुणे – करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात गेले दिड महिन्यापासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचा कुठलाच परिणाम हा साखरेच्या उत्पादनावर झाला नसला तरी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीवर मात्र त्याचा परिणाम झाला आहे. साखरेची विक्री होत नसल्याने कारखान्यांत हजारो टन पोती साखर पडून असल्याने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांकडे पैसेच आलेले नाहीत, त्यामुळे ही रक्कम वाढत जाऊन 18 हजार कोटी रुपयांपर्यत पोहचली आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने (इस्मा) ही माहिती देण्यात आली. साखर ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्याच्या उत्पादनात कुठलाही अडथळा आला नाही. लॉकडाऊनमध्ये कारखानेसुद्धा सुरू होते; परंतु खरेदीदारांकडूनच साखरेची मागणी होत नसल्याने साखरेच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिलपेक्षा यंदा साखरेच्या विक्री मध्ये 10 लाख टन घट झाली आहे.
जगभरात करोनाचे संकट आहे, त्यामुळे जगातील प्रमुख देशांमध्ये सध्या लॉकडाऊन आहे. भारतात सुद्धा 24 मार्चपासून लॉकडाऊन असल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट. खाण्या-पिण्याची छोटी दुकाने, मिठाई विक्रेते, बेकरी उत्पादक सर्व बंद आहे त्यामुळे साखरेची विक्री थांबली आहे. गेले दीड महिन्यापासून साखर विक्रीमध्ये अडचणी निर्माण होत आहे. इतर देशांमध्ये सुद्धा साखरेची मागणी आहे पण, निर्यात बंद असल्यामुळे ही साखर पडून आहे. त्याचा परिणाम कारखान्यांना मिळणाऱ्या रोख स्वरूपात जी रक्कम मिळणार होती ती बंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इस्माचे महाव्यवस्थाक अविनाश वर्मा म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद झाले असले तरी उत्तर प्रदेशातील कारखाने अद्याप सुरू आहेत. परंतु, तेथे सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अनेक कारखान्यांनी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिलेले नाहीत, ही रक्कम प्रत्यक्षात किती हे आत्ता तरी सांगता येत नसले तरी साधारणात: 18 हजार कोटीच्या आसपास असणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी आता केंद्र सरकारने थोडीफार मदत करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यासाठी चार हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते या पॅकेज मध्ये वाढ करून ते आठ हजार कोटी करावे अशी मागणी इस्मा तर्फे करण्यात येणार आहे.
इथेनॉल खरेदी नाही…
साखर कारखान्यांची दुसरी अडचण अशी झाली आहे की, लॉकडाऊनमुळे पेट्रोलची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्याकडून इथेनॉलची खरेदीसुद्धा थांबलेली आहे. पेट्रोलला मागणी कमी असल्यामुळे इथेनॉल घेऊन कुठे ठेवायचे, असा प्रश्न कंपन्यापुढे आहे. त्यामुळे कंपन्या खरेदी करत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.