नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर येत्या 22 ऑगस्टपासून टोकियोत सुरू होत असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मोठे आव्हान असेल. त्यातही भारताची स्टार खेळाडू फुलराणी सायना नेहवालही या स्पर्धेत सहभागी होत असून, तिची कारकीर्द वाचवण्याची ही अखेरची संधी ठरण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला असून, त्यात भारतीय खेळाडूंसाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. भारताची संपूर्ण मदार राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन तसेच किदाम्बी श्रीकांत यांच्यावरच राहणार आहे.
सिंधू हिने 2019 सालीही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली होती. मात्र, यंदा तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी दिग्गज खेळाडूंच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे. सिंधूला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हॅन यूए व वॅंग झी ई या दोन खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सी यंग या बॅडमिंटनपटूंशी तिला सामना करावा लागणार आहेत.
साईना नेहवालला हॉंगकॉंगच्या च्युअँग यी हिचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत तिने विजय मिळवल्यास तिला नंतरच्या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहराचे आव्हान असणार आहे. मालविका बनसोडला डेन्मार्कच्या ख्रिस्तोफरसन हिच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
एकेरी व दुहेरीत संधी…
महिलांप्रमाणे पुरुषांच्या एकेरीतही भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन व एच. एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू एकाच हाफमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा एकच खेळाडू उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत आगेकूच करू शकणार आहे. याशिवाय बी. साईप्रणीत हा भारताचा चौथा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय खेळाडूंसाठी दुहेरी विभागातही सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला मलेशिया व जपान या देशांमधील स्टार खेळाडूंना त्यांना सामोरे जावे लागेल. गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली या भारतीय जोडीसमोर सुवर्णपदक जिंकलेल्या पिअर्ली टॅन तिन्नाह मुरलीधरन यांचे आव्हान असेल.