दररोज प्रतिव्यक्ती 120 लिटर उधळपट्टी : सिंचनाला अडचण
पुणे – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषानुसार पुणे महापालिकेने 150 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिन या नियमाप्रमाणे पाणी वापराचे निर्देश आहेत. मात्र, हा पाणी वापर सुमारे 270 लिटर प्रति व्यक्ती प्रति दिन याप्रमाणे सुरू आहे. त्यानुसार खडकवासला धरणातून दैनंदिन सरासरी 1,460 एमएलडी इतका म्हणजेच वार्षिक 18.62 टीएमसी पाणीवापर होत असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. या वाढीव पाणीवापरामुळे नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे सिंचनासाठी कमी पाणी उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये पाणीवापरावरून “तू-तू-मैं-मैं’ होत असते. महापालिकेची मागणी आहे की वार्षिक पाणीकोट्यात वाढ करण्यात यावी. तर जलसंपदा विभागाकडून महापालिकेचा सध्या होत असलेला पाणीवापर कमी करण्यात यावा, याविषयी तोडगा निघत नसल्याने हा विषय मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरी व ग्रामीण भागाला पाणीवापराच्या नियोजनाबाबत तीनवेळा बैठक घेतली. मात्र, त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत पाणीवापर “जैसे थे’ आहे.
महापालिकेस भामा-आसखेड धरणातून 2.67 टीएमसी इतके पाणी मंजूर केले आहे. त्यानुसार पालिकेची ही योजना 1 जानेवारी 2021 पासून कार्यान्वित झालेली आहे. त्याद्वारे पालिकेस दैनंदिन 200 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेने खडकवासला प्रकल्पातून करत असलेला दैनंदिन 200 एमएलडी पाणीवापर केल्यास दरवर्षी 2.60 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल.
यावर्षी उर्वरित कालावधीत 0.96 टीएमसी पाणी उपलब्ध झाले तर लाभक्षेत्रातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यास उन्हाळा हंगामात सिंचनासाठी दोन परिपूर्ण आर्वतने देता येणे शक्य होईल, असे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे.
पुणे महापालिकेस वारंवार सूचित करूनही पालिकेचा पाणीवापर नियंत्रित म्हणजेच कमी होत नाही. खडकवासला धरणातून पाणी घेण्याची पुणे महापालिकेची पंपहाऊस, जॅकवेल, ग्रॅव्हिटी व्हॉल आदी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागास महापालिकेचा दैनंदिन पाणीवापर कमी करता येत नसल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.