सोरतापवाडी – पूर्व हवेली तालुक्यातील अनेक गावांत रोपांविषयी शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत कोणालाच काळजी नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे, त्यातच नर्सरीमध्ये खराब बियाणे वापरून तयार करण्यात आलेले रोपे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .
दिवसेंदिवस शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करीत आहे. मात्र, इंस्टड फुडप्रमाणे शेतीला वापरण्यात येणारे बियाणे न घेता नर्सरीमधील तयार रोपे आणून शेतीमध्ये लावत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक वाढली आहे. रोपांच्या बाबतीत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, नायगाव, आळंदी, लोणी काळभोर, थेऊर, कोलवडी, साष्टे या गावातील शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी फ्लॉवर पिकाचे रोप आळंदी म्हतोबाची येथून एका दलालामार्फत सोरतापवाडी येथील नर्सरीमधून आणले; पण त्याला नुसताच पाला आलेला असून गड्डे (फळधारणा) मात्र झालेली नाही. काही झाडांना बारीक फळ आलेले आहे. शेतकरी दलालावर भरोसा ठेवून रोपे आणून लावतात; पण या भरोशाचा फायदा दलाल फक्त पैसे कमावण्यासाठी करत असतात.
शेतकरी दत्तात्रय काळभोर, अंकुश गायकवाड आणि विशाल रिकामे, पिंटु काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली काळभोर यांची आणि अशा अनेक शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की आळंदी येथील एका दलालाकडुन सोरतापवाडी येथील नर्सरीमधुन सीएफएल 1522 लॉट क्रण 14534454 या जातीच्या फ्लॉवर पिकाची रोप आणली. दीड ते दोन महीने याला फळधारणा झाली नसल्यामुळे रिकामे यांनी कृषी विभागात अर्ज केला आणि सबळ पुरावे सादर केले.
कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून लवकरच अहवाल देणार असल्याचे त्यांना सांगितले.शासनाने त्वरित या बाबत दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे पूर्व हवेलीतील शेतकरी बोलुन दाखवत आहेत.
पावती दाखवताच अधिकार निःशब्द
याविषयी नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तर एक कृषी अधिकारी म्हणाले की, शेतकऱ्यांकडे पावती नसल्याने काहीच होणार नाही; पण जेव्हा पावती आणि अर्ज दाखविण्यात आले तेव्हा ते अधिकारी निःशब्द झाले आणि एकमेकांवर हे प्रकरण ढकलून मोकळे झाले.