बारामती तालुक्यात कांदा, सोयाबीन, मका पीक सडले
वाघळवाडी – बारामती तालुक्यातील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाशी सामना करतो आहे. तर यंदा चांगला पाऊस झाल्याने तो जरा आनंदी होता त्यामुळे त्याने कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे त्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून हातातोंडाशी आलेले सर्वच पिके सडून गेल्याने अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी गुडघे टेकले आहे.
बारामती तालुक्यात सर्व भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असल्याने लाखो हेक्टर तर करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली असली तरी झालेले नुकसान न भरण्यासारखे असल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. जरी शासकीय मदत मिळाली तरी ती कधीच पुरेसी नसते असा इतिहास असल्याने संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.
दरम्यान, सोमेश्वरनगर परिसरतील होळ फार्मवरील नोंदीनुसार यंदा 1998 नंतर उच्चांकी पावसाची नोंद झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा साडेचारपट अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती एमएसीएस-आघारकर संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आली.
मी दीड एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती; मात्र अतिवृष्टीमुळे संपूर्ण कांदा सडून गेला आहे. एकरी 60 हजार रुपये खर्च झाला होता. मी इतका हतबल झाला आहे की उभ्या पिकांमध्ये आता नांगर फिरवावा लागणार आहे. – तानाजी भापकर, शेतकरी, चौधरवाडी