भार्गव : अन्यथा मॅन्युफॅक्चरिंग वाढले असते
नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतर आपण रशियासारखे समाजवादी औद्योगिक धोरण स्वीकारल्यामुळे आपण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मागे पडलो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून रोजगार निर्माण होत नाही, असे मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय उत्पन्नातील मॅन्युफॅक्चरिंगचे प्रमाण 25 टक्के करण्याचा प्रयत्न चालू असूनही यश मिळत नाही. सध्या भारत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात पिछाडीवर आहे तर सेवाक्षेत्राचे योगदान गरजेपेक्षा जास्त आहे. सेवाक्षेत्रातील नोकऱ्या ठिसूळ असतात.
सरकारने मेक इन इंडिया जाहीर केल्यामुळे या क्षेत्रात प्रगती होऊ लागली असल्याचे ते म्हणाले. जुन्या धोरणात सरकार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्या चालवत होते. त्यामुळे स्पर्धात्मकता वाढत नव्हती. आता हे काम खासगी क्षेत्राला दिले जात असल्यामुळे काही क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढली आहे.
रशियाप्रमाणे चीन, फिलीपाईन्स इत्यादी देशांनीही आपल्यासारखे धोरण चालू ठेवले होते.
मात्र, काळाच्या ओघात इतर देशांनी आपली धोरणे पन्नास वर्षांपूर्वीच बदलली व ते देश पुढे गेले. भारताने धोरण बदलण्यास उशीर केला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुदान देण्याच्या पद्धतीमुळेही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादनमूल्य जास्त झाले. त्यामुळे आपण निर्यातपेठेत मागे राहिलो, असे भार्गव यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.
..तरच वाहन उद्योग वाढेल
दुचाकी आणि इतर वाहननिर्मिती क्षेत्रात भारताने गेल्या 30 वर्षांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. आता करोना व्हायरसनंतर या क्षेत्राबाबत काय, असे मला विचारले जाते. ते म्हणाले की, वाहन क्षेत्राच्या उत्पादकतेचा प्रश्न नाही. मात्र, इतर क्षेत्रे आणि एकूणच राष्ट्रीय उत्पन्न वाढले तर लोकांची क्रयशक्ती वाढून कार खरेदी वाढेल.