ग्रामीण भागात जिल्हा परिषदेतर्फे “चवदार पाणी’ योजनेचा प्रारंभ : गावोगावी उद्घाटन
पुणे – जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती वस्त्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वैयक्तिक नळजोड देण्याच्या “चवदार पाणी योजने’ चा शुभारंभ रविवारी पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध ठिकाणी तेथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या उपस्थित या कामांचा शुभारंभ झाला.
या योजनेसाठी दहा टक्के लोकसहभागाची अट नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 3 हजार 606 दलित वस्त्या असून, त्यातील 1 हजार 59 वस्त्यांमध्ये घरपोच नळ जोडणीची कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी 218 वस्त्यांमध्ये नळ जोड योजनेचे आराखडे पूर्ण झाले असून या वस्त्यांमध्ये आजपासून कामाला सुरुवात झाली. त्यासाठी 5 कोटी 47 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
समाज कल्याण विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार कदम यांनी चवदार पाणी योजनेच्या सुमारे अडीचशे गावांचा आराखडा तयार करून, आज प्रत्यक्षात गावांमध्ये या कामांना सुरुवात झाली.
कमवा व शिका योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बीबीएच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दौंड तालुक्यातील शिंदे गोष्टी येथे समाज कल्याण सभापती सारिका पानसरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्वशील शितोळे यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.