मुंबई – बॅंक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी 11 मार्चपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.
मुंबईत बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बॅंक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात आज बैठक झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांना बॅंक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळे 11 मार्चपासून पुकारण्यात आलेला संप स्थगित करण्यात आला. ही माहिती इंडियन बॅंक असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी दिली.
11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान पुकारण्यात आलेल्या संपामुळे ग्राहकांची मोठी कोंडी झाली असती. कारण बॅंक कर्मचाऱ्यांनी संपासाठी हा कालावधी निवडला. त्यानंतर 14 मार्चला दुसरा शनिवार असल्याने आणि 15 मार्च रोजी रविवार असल्याने बॅंका बंद असणार आहेत. तर 10 मार्च रोजी होळीची सुट्टी बॅंकांना असल्याने बॅंका बंद असणार आहेत. जर संप स्थगित झाला नसता तर 10 मार्च ते 15 मार्च म्हणजेच सलग सहा दिवस बॅंका बंद राहिल्या असत्या. मात्र संपाला स्थगिती दिली गेल्याने आता असे होणार नाही.