महिला व बालविकासच्या पुणे विभागाचा घेणार आढावा
सातारा – राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा, महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शनिवारी (दि. 11) जिल्हा दौऱ्यावर असून सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात ते महिला व बालविकासच्या पुणे विभागाचा आढावा घेणार आहेत. राज्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू यांचा हा पहिलाच दौरा आहे.
बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, अपंगांसाठी व्यापक लढा उभारुन प्रसंगी प्रशासनाला धारेवर धरले आहे. आक्रमक आंदोलनामुळे बच्चू कडू प्रसिद्ध असून नुकताच त्यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. जिल्ह्यात त्यांचा पहिलाच दौरा असून शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ना. कडू यांचे जिल्हा परिषदेत आगमन होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाचा आढावा घेतल्यानंतर श्री. कडू शासकीय विश्रामगृहावर अर्धा तास थांबणार आहेत. दुपारी दीड वाजता ना. कडू कराडकडे जाणार असून मुंढे (ता. कराड) येथील हुतात्मा जवान संदीप सावंत यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम सोहळा व्याख्यानास ते उपस्थित राहणार असून त्यानंतर विटा (जि. सांगली) येथील शेतकरी मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.
बच्चू कडूंच्या दौऱ्यांची प्रशासनाला धास्ती
ना. बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, निराधार, विधवा महिला, अपंगांच्या मागण्यांसाठी गेल्या कित्येक वर्षापासून लढा उभारला आहे. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. मिंत्रमंडळात समावेश झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन नायब तहसीलदारांचे निलंबन केले होते.
बच्चू कडू यांनी सर्वसामान्यांसाठी आक्रमक आंदोलने करत ग्रामसेवकांपासून ते मंत्रालयातील सचिवांपर्यंत कोणाचीही गय केली नाही. असे आक्रमक बच्चू कडू शनिवारी साताऱ्यात येऊन आढावा घेणार असल्याने त्यांच्या दौऱ्याची प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे.