भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनाचे औचित्य साधून सामनाने विशेष अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर! ‘‘देश संकटात आहे!’’ अशा शीर्षकासह विशेष अग्रलेख प्रसिद्ध केला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे. न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो. परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे! अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल! आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत!! असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. देशाच्या कानाकोपऱ्यांतून या महामानवास आज श्रद्धांजली अर्पण केली जाईल. मुंबईतील चैत्यभूमीवर तर त्यांच्या अनुयायांचा महासागर उसळेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगत, ‘महाराष्ट्राची दोनच दैवते खरी. पहिले शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’ मात्र या दोन्ही दैवतांचा आज राजकारणापुरता वापर करण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले. लोकशाही म्हणजे संवाद. शासन आणि जनता यांच्यातील संवाद, म्हणजेच खरीखुरी लोकशाही. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संवाद लोकशाहीला अभिप्रेत आहे. ज्यांचे सरकारशी चांगले जमते आणि ज्यांची मतभिन्नता आहे त्यांच्यात संवाद व्हायलाच हवा. मात्र केवळ ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या बहुमतवाल्यांचे शासन म्हणजे लोकशाही नव्हे. असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
लोकशाहीमध्ये बहुमतवाल्यांच्या शासनाला विरोधकांची गर्भित व उघड संमती आवश्यक असते. म्हणूनच विरोधकांचा आवाज बंद पाडून तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही. ख्यातनाम ब्रिटिश विचारवंत हेरॉल्ड लास्की म्हणतात, ‘आपल्या समर्थकांच्या स्तुतीपेक्षा टीकेतून सरकार अधिक शहाणे होत असते.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेने हे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आपल्याला दिले. पण त्याच घटनेचे अवमूल्यन आज केले जात आहे व घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यास पायदळी तुडवले जात आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते. त्यांनी सांगितले होते.
डॉ. आंबेडकर त्याच वेळी म्हणाले होते की, ‘या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो खरवडून काढणे कठीण आहे.’ आज अनेक शेंदूर फासलेल्या दगडांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्याकडे पाहून डॉ. आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य राष्ट्राने आपल्या डोक्यावर धारण केले आहे. पण आज सत्य औषधापुरते नव्हे, तर औषधालाही मिळत नाही. नफेखोरांचेच राज्य चालले आहे व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांची आठवण जनतेला रोजच येत आहे. डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते. मानव समाजावरील आणि हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
अखेर भारतीय घटनेद्वारा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक विचारत्रिमूर्तीची 1950 साली प्रतिष्ठापना करून अस्पृश्यता हा गुन्हा ठरवीत 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन मानवतेला मुकलेल्या माणसाला अस्मिता बहाल केली. स्वतःचे व्यक्तित्त्व दिले. हा संपूर्ण लढा त्यांनी देशहिताला यत्पिंचितही धक्का लागू न देता लढवला. समाजाचा एक फार मोठा विभाग विकलांग असेल तर समाज सशक्त होऊच शकत नाही, असे त्यांनी वारंवार बजावले.
प्रकृती खालावली असतानाही त्यांनी प्रचंड परिश्रम करून हिंदू कोड बिल तयार केले आणि हिंदूंना एक हजार वर्षांपूर्वीच्या पुराणकाळ जमान्यातून आधुनिक एकविसाव्या शतकात आणणारी संहिता दिली. त्यांनी समान नागरी कायद्याचाही आग्रह धरला. अशा प्रकारे सारे राष्ट्रच एकसंध व समर्थ करण्यासाठी जितकी शिकस्त करता येईल तितकी त्यांनी केली. ते कमालीचे स्वाभिमानी होते. धार्मिक – सामाजिक आघाडीवर हिंदू कोड बिल तसेच राजकीय आघाडीवर नियोजनामार्फत समाजवादी समाजरचना या त्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडताच त्यांनी पेंद्रातले मंत्रिपद फेकून दिले. असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
देश आणि दलित
यात दुरावा निर्माण करण्याचे सोडाच, पण हा देश माझा असून या देशाचा मी मालक ही शिकवण त्यांनी जनतेत बिंबवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते होते असा अपप्रचार जे करतात ते मूर्ख आहेत. डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक व नेते होते. त्यांची जातीयतेविरुद्धची लढाई समर्थ देशासाठी होती. पण जातीयवाद सत्ताधाऱ्यांच्या रोमारोमांत भिनलेला आहे. पंतप्रधान मोदी काशीला गेले. त्यांनी गंगेत डुबकी मारली व किनाऱ्यावरील तंबूत पाच दलितांचे पाय धुतले. अशाने काय जातीयता नष्ट होणार आहे? डॉ. आंबेडकरांची आठवण अशा वेळी येथे येतच राहील. डॉ. आंबेडकरांनी 1933 सालीच सांगून टाकले होते की, मी हिंदू धर्माचा त्याग करीन हे नक्की आणि इस्लामचा स्वीकार करणार नाही हेदेखील नक्की! पाकिस्तानने अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. हे त्यांचे राष्ट्रावर व हिंदू धर्मावर उपकार आहेत. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही, कारण इस्लाम धर्मात परिवर्तनशीलता नाही. त्यात कुराणाचा शब्द अखेरचा आहे. ज्यात अक्षराने बदल करता येत नाही. डॉ. आंबेडकरांना हे मान्य नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे. न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. अनेक प्रकरणांत कायदे स्वस्थ बसत आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो; परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे. देशाच्या एकसंधतेला तडे जातील असे हे धोरण आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय. लोकशाही, स्वातंत्र्य जेव्हा जेव्हा संकटात येईल त्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे स्मरण करावेच लागेल! आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांतर्फे ते करीत आहोत!! असं सामनात म्हणण्यात आलं आहे.